उपदेश
भगवान् श्री रमण महर्षी यांनी आपल्या वयाच्या सतराव्या वर्षीच स्वतःला ‘मी कोण?’ असा प्रश्न विचारला आणि त्या ‘मी’ च्या सत्यस्वरूपाचा शोध घेतला. हा माझा देह म्हणजे मी नव्हे; माझे विचार, भावना असणारे मन म्हणजे मी नव्हे; अशा तर्हेने एका बाजूने नकारात्मक दिशेने विचारणा केली आणि त्याचवेळी, जरी हा माझा देह जाळण्यात आला, तरीही मी शिल्लक उरणारच, जरी मी माझे मन नाहीसे केले, तरीही मी शिल्लक उरणारच, अशा तर्हेने दुसर्या बाजूने होकारात्मक दिशेने विचारणा केली. आणि अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीमध्ये ते ह्या प्रश्नाच्या उगमस्थानापर्यंत जाऊन पोहोचले. तो जो कोणी ह्या सगळ्याच्या पलीकडे असणारा, मूलभूत असा, शाश्वत असा आहे, तो म्हणजेच आपला आत्मा होय, ह्याचे त्यांना ज्ञान झाले. इतकेच नव्हे तर, आपले मूलतत्त्व म्हणून असणारे आत्मन् आणि इतर सर्वांचे मूलतत्त्व म्हणून असणारे आत्मन् हे एकच आहे, ह्याचाही त्यांना साक्षात्कार झाला.
जे मला जमले, ते प्रयत्न केला तर तुम्हालाही जमेलच, इतके साधेपणाने सांगितला गेलेला हा महर्षींचा मार्ग. आणि हाच त्यांचा उपदेश. एका शब्दात सांगायचे झाले, तर ‘आत्मनिष्ठ’ होणे. एका वाक्यात सांगायचे झाले तर, आत्मज्ञान हे उद्दिष्ट ठेवून अंतर्मुख होऊन ‘मी कोण?’ ह्या प्रश्नाच्या साह्याने स्वतःच्या हृद्-स्थानी शिरून आपल्या खर्या स्वरूपाची जाणीव करून घेणे, हाच महर्षींचा ‘आत्म-विचारणे’चा स्वानुभवसिद्ध ज्ञानमार्ग होय. याकरिता, मार्गण म्हणजेच आत्मविचारणा, मज्जन म्हणजेच परमेश्वरापाशी समर्पण आणि वायुरोधन म्हणजेच प्राणायाम ह्या तीन पद्धतींची दखल घेऊन अखेरीस, हृदयामध्ये स्वतःला स्थापित करून आत्मनिष्ठ व्हा, असे सगळे एकत्रितपणे सांगणारा

महर्षींचा उपदेश म्हणजे, मुद्दाम, आपण होऊन, कोणाला काही उपदेश करावा यासाठी बोलण्यात आलेले शब्द नाही आहेत. साधकाने आपल्याला पडलेले प्रश्न महर्षींसमोर मांडले, कधी उत्सुकता म्हणून, कधी कुठले शास्त्र-वचन जाणण्यासाठी, कधी चिकित्सापूर्वक, तर कधी स्वतःची अडचण सोडवावी म्हणून. आणि त्या साधकाचे शमन होईपर्यंत महर्षींनी त्याला उत्तरे दिली. ते हे संवाद आहेत. सहज-निर्विकल्प-समाधीच्या अवस्थेमध्ये वावरणार्या महर्षींसारख्या आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच्या मुखातून त्यावेळी ही अमृतवाणी स्रवली, आणि त्या एकाच्या निमित्ताने आज सर्व जगासाठी हा अमर ठेवा खुला झाला.
Next: Read his instructions and download the booklet “Who am I”